माझ्या कित्येक कवितेत 'ती'चा उल्लेख नेहमी होतो. माझे मित्र मला विचारतात की ' योग्या तुझी ती कोण आहे! ! जिच्यासाठी तु आजपर्यंत इतक्या कविता लिहिल्या आणि लिहित असतोस !! तेव्हा त्यांना काय सांगावं हा प्रश्नच पडतो. आता ती कोण आहे हे सांगाणार तरी कसं. 'स्वप्नातुन ती अगदी समोर जरी आली तरी तुझी लेखणी तिच्या सौंदर्याच कौतुक करण्यात गुंग होऊन जाईल एवढं तिचं कौतुक कवितेतुन करतोस ..!' अस म्हणारा माझा मित्र नक्की मला काय सुचवतो तेच कधी कळत नाही. ' बाकी योग्या तूझ्या कवितेतील ती माझ्या आयुष्यात आली ना तर आयुष्यच बदलून जाईल ना माझं!! असं म्हणारा तुष्या माझ्या कवितेतील 'ती' शोधतोय तेही स्वतःसाठी असही मला गुप्तचर यंत्रणे कडुन कळलंय. असो ती त्याला लवकरच मिळेल ही.
उदास किंवा अगदी प्रेमभंग झालेल्या माझ्या कविता वाचणारे लोक माझ्या भुतकाळात मला कोणी ती सोडुन गेली असणार असा अंदाजही लावतात. शेवटी त्याची तरी काय चुक म्हणा. ' योगेश सांगत नाही आपल्याला पण नक्कीच त्याची प्रेयसी त्याला बोलत नाही बघं !! अरे पैज लावून सांगतो ना!! त्याच्या कवितेतुनच कळतना!! ' मग बहुदा त्यांनी माझ्या मोजक्याच कविता वाचल्या असाव्यात अशी मी आपली मनाची समजुत करुन घेतो आणि ती चा विषय बाजुलाच ठेवतो. शेवटी प्रत्येक कवितेला काही पार्श्वभुमी असते हे नक्कीच मग अशा कविता का लिहिल्या याचा विचार मी तरी करत नाही. पण मनातील ती ला प्रत्येक नजरेतुन पाहण्याचा प्रयत्न करतो मग त्यात प्रेम व्यक्त करणं , विरह , ओढ आणि अशा कित्येक प्रेमाच्या छटा मी माझ्या कवितेतुन लिहिण्याचा प्रयत्न करतो. त्या प्रत्येक छटां मध्ये ती ला पाहण्याचा प्रयत्न करतो.
अगदी सांगायच तर प्रेम हे इतक सुंदर असतं की ते व्यक्त करायला भावनांची जोड लागतेच. मग ते 'ती'ला कळो अथवा न कळो. माझ्या प्रत्येक कवितेत मी 'ती' च्या सोबत जगलोय. प्रत्येकांच्या मनात तो किंवा ती चा चेहरा असतोच मग तो चेहरा काहीजण मनात लपवुन ठेवतात तर काही माझ्या सारखे त्याला कवितेत मांडुन हजारो रुप देतात. मी ही तेच केलंय. आज सगळ्यांना माझ्या मनातील ती कोण हे जाणुन घ्यायचंय कारण प्रत्येकाच्या मनात कोठेतरी ती नक्कीच असते जी माझ्या कवितेतुन त्यांना 'ती' ची आठवणं करुन देते .. हो ना?
रात्र वेडी गंधाळूनी, रातराणी जवळ बसली !! क्षणभर विसरून अंधारास त्या, मनसोक्त बहरली !! दूर दूर त्या वाटेवरती, खळखळून ती हसली !! पाना फुला फांदीवरती,हरवून जणू ती गेली !! चंद्रासवे लपंडाव तो, पुढे पुढे चालली !! चांदण्यासवे बोलता ती, गीत गाऊ लागली !! गार वारा वाहता बेधुंद, गारठू ती लागली !! कुठे शेकोटी दिसता मग, उब घेत राहिली !! स्वप्नांच्या त्या जगात मग, हळूच ती पोहचली !! सुर्यासवे तेव्हा ती नकळत, रात्र जणू भेटली !! धावून धावून थकली अन् , कुठेतरी अडखळली !! सत्याच्या त्या अंधारात, पुन्हा येऊन रुसली !! शांत राहुन जणू मग, खूप ती बोलली !! झोपलेल्या त्या अंधारात, कोणीच ना ऐकली !! कवेत घेऊन आपल्या, निपचित ती पडली !! कित्येक गुपित जाणून ती, तरीही नाही दिसली !! कुठे प्रणयाच्या स्पर्शामध्ये, हळूच मग ती लाजली !! कुठे वाट पाहण्या नजरेत, अश्रू मध्ये त्या दिसली !! कुठे मुक्त फिरत्या अनोळखी, नात्यामध्ये फुलली !! कुठे मायेच्या कुशीत ती, निश्चित होऊन झोपली !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Leave a Reply